कर्मचार्यांवर कामाचा अतिरिक्त भार; कामांचा खोळंबा
। सुधागड -पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील महसूल विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचार्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असून सर्वसामान्यांची कामे सुद्धा खोळंबत आहेत.
सुधागड-पाली तहसील कार्यालयात एक मंडळ अधिकारी, तीन महसूल सहाय्यक, एक तलाठी, तीन शिपाई व सात कोतवाल अशी एकूण 15 पदे रिक्तआहेत. परिणामी, कामकाजात व्यत्यय निर्माण होत आहे. कार्यालयाशी संबंधित अनेक कामे प्रभारींच्या भरवशावर असल्याने कामांना विलंब होत आहे.
तलाठ्यांच्या रिक्त पदांचा भार इतर तलाठ्यांवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील जनसामान्यांसह शेतकर्यांच्या विविध कामांचा खोळंबा होत आहे. त्याशिवाय महसुल सहाय्यक तसेच इतर काही विभागातील पदे रिक्त आहेत. या सर्व पदांना प्रशासकीय स्तरावर मान्यता असताना आणि येथील अधिकार्यांकडून पाठपुरावा केला असतानाही सुद्धा ही पदे भरण्याबाबत वरिष्ठ पातळीवरील अधिकारी उदासीन असल्याचे दिसत आहे.
रिक्त पदांमुळे तालुक्यातील हजारो विद्यार्थी, शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामे खोळंबत असल्याने त्यांना मोठा मनस्ताप होत आहे. त्याशिवाय रिक्त पदांचा प्रभार सांभाळणारे कर्मचारीही अतिरिक्त जबाबदारीमुळे आपल्या मूळ आस्थापनेच्या ठिकाणच्या कामांना न्याय देण्यात अपयशी ठरत आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे.
योजना निराधार
संजय गांधी निराधार योजना विभागातील नायब तहसीलदार पद रद्द केले असल्याने त्या पदाला पुन्हा मंजुरी देण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. तालुक्यातील हजारो निराधार, अपंग, वृद्ध लाभार्थींच्या मानधनाचा प्रश्न बिकट होत आहे. त्यामुळे या विभागातील नायब तहसीलदाराच्या पदाला पुन्हा त्वरीत मान्यता देण्याची मागणीही तालुक्यातील निराधार, अपंग, वृद्ध लाभार्थींकडून करण्यात येत आहे.
रिक्त पदांमुळे खोळंबलेली कामे व कर्मचार्यांच्या कामाचा अतिरिक्त भार या बाबी लक्षात घेऊन जिल्हास्तरावरून रिक्त पदांच्या ठिकाणी कायम नियुक्त्या करण्यात याव्यात.
दत्तात्रेय दळवी, संस्थापक, स्वयंपूर्ण सुधागड