एमएसआरडीसीच्या अधिकार्यांसमावेत चर्चा
| उरण | प्रतिनिधी |
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून करंजा-रेवस पूल उभारण्यात येत आहे. प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणार्या या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गाच्या जोड मार्गिकेत बदल करण्याची मागणी करीत करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. याची दखल घेत एमएसआरडीसीच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले.
उरणच्या करंजा ते अलिबाग येथील रेवसदरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे भूमीपुजन 13 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. 2 हजार 478 कोटी रुपयांची निविदा या पुलाच्या उभारणीसाठी मागविण्यात आली आहे. या पुलाची एकूण लांबी ही 10.209 किलोमीटर आहे. मुंबईतील सागरी अटल सेतूमार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात प्रवास करता येणार आहे. नियोजित रेड्डी ते रेवस मार्गापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1980 साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांनी करंजा ते रेवस मार्गाची घोषणा केली होती. यावेळी भूसंपादनाची प्रकिया राबवून प्रत्यक्षात कामाला सुरुवातसुद्धा करण्यात आली होती. परंतु, काही कारणास्तव सत्ताबदल होऊन अंतुलेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या पुलाचे काम बंद झाले होते. 42 वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्याने सरकारने एमएसआरडीसीकडून हा मार्ग तयार करण्याची घोषणा केली. त्यासाठी या मार्गावर करंजा ते रेवस हा सागरी पूल उभारला जाणार आहे. या पुलाला जोडणार्या मार्गासाठी करंजा येथील चाणजे महसूल हद्दीतील जमीन संपादित करण्यात येणार आहे.