पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे मत
| पेण | प्रतिनिधी |
सोशल मीडियामुळे समाजात अफवांचे पीक आले असून, यामुळे समाजा-समाजात तिढा निर्माण होतो. त्याचे पर्यावसान पुढे दंगलीत होते, या घटनांमध्ये समाजाची मोठी हानी होते, असे मत रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी व्यक्त केले. ते पेण येथे गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी वाचनालयाच्या सभागृहात शांतता कमिटीची बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. माणसाच्या संवेदना बोथड होऊ लागल्या आहेत, त्यामुळे कळत नकळत माणूस माणुसकीच विसरत चालला आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक आहे. याचाच फायदा आज समाजकंटक घेत आहेत. त्यामुळे अफवांवर पायबंदी घालणे गरजेचे आहे. कोणत्याच धर्म ग्रथांत असे लिहिलेले नाही की, दुसऱ्या धर्माचा द्वेष करा. दुसऱ्या धर्मांच्या माणसांना त्रास द्या. सर्व धर्मात शांतीचे संदेश दिले आहे. परंतु समाजात तिढा निर्माण करणारे कोणत्याही धर्माचे असू शकत नाहीत. या समाज कंटकांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मच नसतो. त्यामुळे अफवांवर लक्ष न देता आपला सण उत्साहात साजरा करायचा आहे, असे आवाहन त्यांनी केले.
सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, सर्व गणेश मंडळांनी आपल्या बाप्पाच्या सजावटीच्या आजूबाजूने सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत जेणे करून ते सुरक्षतेच्या दृष्टीने उपयोगी येतील. नगरपालिकेने विर्सजन घाटावर योग्य ती लाईटची सुविधा करावी, पार्किंगची व्यवस्था करावी, ग्रामीण भागामध्ये पोलीस पाटलांनी गावातील प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवावेत, यासह शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अनेक सूचना दिल्या. तर प्रांताधिकारी प्रविण पवार यांनी शहरासह ग्रामीण भागात कशा प्रकारचे गणपती उत्सवाचे नियोजन केले आहे याबाबत माहिती दिली.
या सभेचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतडे यांनी केले. नगरपालिकेकडून मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी गणपती उत्सवासाठी शहरात केलेल्या तयारीची माहिती दिली. पेण आगारप्रमुख अपर्णा वर्तक यांनी एसटी महामंडळाच्या नियोजनाबद्दल सांगितले, तर महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता धनंजय पाटील यांनी महावितरणकडून गणेशोत्सवाच्या काळात घेण्यात येणारी काळजी याविषयी माहिती दिली.
या शांतता कमिटी बैठकीसाठी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित गोळे, वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी मेहनत घेतली. या बैठकीसाठी नायब तहसिलदार प्रसाद कालेकर, शांतता कमिटीचे सदस्य, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, पेण पोलिस पाटीलचे अध्यक्ष हर्षल लांगी, हरिचंद्र दुधावले, निलकंठ म्हात्रे, रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्य राजू पिचिका, वंदना पाटील, प्रतिष्ठित नागरिक वाशी सरपंच गोरख पाटील, वडखळ सरपंच योगेश पाटील, दिपश्री पोटफोडे, राजू वारकर आदींसह मोठ्या संख्येने पेणकर उपस्थित होते.