पालक झालेत हतबल
रायगडचे विद्यार्थी करताहेत जीव मुठीत घेऊन प्रवास
। भारत रांजणकर । अलिबाग ।
रशिया आणि युक्रेनमध्ये फुटलेल्या युध्दामुळे शिक्षणासाठी भारतातून गेलेल्या विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात सापडले आहेत. रशियाच्या सिमेजवळ असलेल्या खारकीव तसेच इतर प्रांतातील विद्यार्थ्यांना अजूनही बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. त्यांच्या सुटकेबाबत अजून काहिच निश्चित झालेले नाही. भारतीय दुतावास जो पर्यंत काही करत नाही तोपर्यंत हे विद्यार्थी सुखरुप बाहेर पडू शकत नसल्याचे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगत आपल्या मुलांना सोडवण्याची आर्त विनवणी करीत आहेत. तर इतर प्रांतात असलेले बरेचशे विद्यार्थी अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन युक्रेनची सिमा ओलांडून रोमानियापर्यंत पोहचले आहेत. तिथून हवाई मार्गाने प्रवास करुन मायदेशात परतणार असले तरी विमानाचे तिकीट कन्फर्म होण्यास अवधी लागत असल्याने सर्वांचाच जिव टांगणीला लागला आहे.
डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले रायगडातील 32 विद्यार्थी हे युक्रेनच्या विविध भागात अडकले आहे. रायगडातील अलिबाग, महाड, पेण, तळा, माणगाव, खोपोली, पनवेल या तालुक्यातील विद्यार्थी अडकले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देशातील 12 हजार पेक्षा जास्त लोक युक्रेन मध्ये असून त्यातील 1200 च्यावर विद्यार्थी शिकण्यासाठी गेलेले आहेत. आतापर्यंत देशभरातील 1 हजार 629 जण मायदेशात परतले असल्याचे वृत्त आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यापैकी जे विद्यार्थी रशिया आणि युक्रेनच्या सिमेजवळच्या प्रांतातील शहरात आहेत. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला असल्याचे पालकांनी सांगितले. भारतीय दुतावास हव्या त्या गतीने हालचाली करत नसल्याचे म्हणणे या विद्यार्थ्यांच्या पालकांचे आहे. या परिसरातील एखाद दुसरे दुकान सुरु असल्याने खाण्यापिण्याचे साहित्य दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मदतीची गरज असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी तेथील प्रशासन आणि भारतीय दुतावासाच्या अधिकार्यांच्या सुचनेनुसार स्वतःचा जिव मुठीत घेऊन बसमार्ग दहा बारा तासांचा प्रवास करुन कसेबसे रोमानियाच्या सिमेजवळ पोहचू शकले आहेत. तिथून आता विमानाने त्यांना परत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आर्यन पाटील ( पेण झिराडआळी), कोमल पाटील (पेण शिर्कि बोरावे), अभिजित अशोक थोरात (खोपोली), साहिल म्हामूणकर (पनवेल लाडीवली), मुग्धा मोरे (महाड), पूर्वा पाटील (अलिबाग धेरंड), समीक्षा शिरसाट (पनवेल खारघर), यश काळबेरे (तळा), कल्पित मढवी (पेण), श्रद्धा पाटील (पेण), प्रेरणा दिघे (पेण), अद्वैत गाडे (पनवेल), विजया माने (कर्जत), श्रेयस टिळे (पनवेल), रुशवंती भोगले (पनवेल), साई मोरे (खालापूर), कुणाल कुवेसकर (पनवेल), शिल्पीता बोरे (पनवेल), अमर करंजीकर (माणगाव), तुराम बेरादर (बिरवाडी महाड), शोहिब पठाण (बिरवाडी महाड), सालवा धनसे (खोपोली), प्रचिती पवार ( करंजाडे पनवेल), नाहुश गायकवाड (नागोठणे, रोहा), श्रेयस तिळे (कर्जत), राम बेरदार, (बिरवाडी,महाड) येथील एक विद्यार्थी असे एकुण 32 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत.
सुमी सुमास्का येथे माझा मुलगा कल्पित अडकला आहे. सदर प्रांत रशियाच्या सिमेजवळच असल्याने तिथे प्रत्यक्षात युद्धाचाच प्रसंग आहे. जवळच्या एका हॉस्टेलपरिसरात बॉम्ब पडल्याने तेथील मुलांना आपला मुलगा असलेल्या इमारतीत हलविण्यात आले आहे. त्यामुळे आम्हा दोघांची 24 फेबु्रवारीपासून झोप उडाली आहे. सरकारने हालचाली करुन तातडीने रशिया सिमेजवळील विद्यार्थ्यांना प्राधान्याने सुरक्षित हलवावे. – सुधीर मढवी, पेण, विद्यार्थ्याचे पालक
विनास्ता येथे असलेली आपली मुलगी जीव मुठीत घेऊन रोमानियापर्यंत पोहचली असून गेल्या दोन दिवसांपासून विमानाचे तिकीट मिळण्यासाठी प्रतिक्षा करीत आहे. तिच्या मागून आलेल्या विद्यार्थ्यांना तिकीट देखील मिळाले. मात्र आपल्या मुलीला अजून तिकीट मिळत नसल्याने जिव टांगणीला लागला आहे. भारतीय दुतावासाने त्वरीत प्रयत्न करुन मदत करावी. – हिमाली दिघे
रोमानिया मध्ये सुखरुप पोहचलेल्या आपल्या पाल्याला रोमानियामधून चांगली मदत केली जात आहे. खाणे-पिणे तसेच कपडे आदी चिजवस्तू दिल्या जात आहेत. सध्या विमानतळावरील बंकरमध्ये ठेवण्यात आले असून विमान निश्चित होताच पाठविले जाणार आहे. – रमिझ धनसे, खोपोली