| नागोठणे । वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन एक तप पूर्ण झाले. तरीही पळस्पे ते इंदापूर महामार्गाची अवस्था दयनीय आहे. पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रमण होताना चालकांची अक्षरशः दमछाक होते. रस्त्यावरील खड्डे प्राधान्याने बुजवावेत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
रखडलेले रुंदीकरण, पावसामुळे ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे हा प्रवास नकोसा होतो. खड्डेमय मार्गातील प्रवासामुळे चालकांसह प्रवाशांना आरोग्याच्या व्याधी उद्भवतात, शिवाय अपघाताचाही धोका संभवतो, हे टाळण्यासाठी लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.