आमटेम ते कोलेटी व निडी ते नागोठणेपर्यंत रांगाच रांगा
| नागोठणे | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी (दि.10) पहाटेपासून प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सकाळी पहाटे साधारणतः 5.30 वाजल्यापासून महामार्गावर वडखळ ते कोलाड दरम्यान आमटेम तसेच पुढे नागोठणे येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी पहाटेपासून आमटेम ते नागोठणे फाटा येथे वाहनांच्या सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. तर यामुळे कोकणच्या दिशेने जाणार्या प्रवाशांसह मुंबईकडे जाणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या कोंडीमुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागला आहे.
शनिवार-रविवार आणि मे महिन्याच्या सुट्ट्या तसेच सध्या सर्वत्र लग्न समारंभ सुरु असल्याने महामार्गावरील वाहनांची संख्या अचानक अधिकच वाढल्याने शनिवारी पहाटे साधारणतः 5.30 वा. वडखळपासून पुढे आमटेम येथे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. यावेळी आमटेम ते कोलेटी दरम्यान वाहनांच्या सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या ठिकणची वाहतूक जिल्हा वाहतूक पोलीस व महामार्ग वाहतूक पोलीस यांना तब्बल तीन तासांनंतर सुरळीत करण्यास यश आले. मात्र, याचवेळी पुढे निडी ते नागोठणे फाटा येथे सकाळी 8 वाजल्यापासून बेशिस्त वाहनचालकांमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. येथेही वाहनांच्या सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर लांब रांगा लागल्या. यावेळी जिल्हा वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या अथक परिश्रमाने सुमारे चार तासांनी 12 वा. महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी अचानक वाहनांची संख्या वाढली. परिणामी वाहतूक कोंडी वाढली. वडखळ ते कोलाड दरम्यान आमटेम, कोलेटी, निडी, नागोठणे याठिकाणी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे तासाभराच्या प्रवासाला अडीच ते तीन तास लागत असल्याने प्रवाशांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहावयास मिळाली. तर दुसरीकडे मुंबईकडे जाणार्यांना प्रवाशांना या वाहतूक कोंडीतून बाहेर पडून मुंबईला लवकर पोहोचण्याची घाई झाली होती. त्यामुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहने बेशिस्तपणे चालवली जात होती. परिणामी, ही वाहतूक कोंडी झाली असून, ही कोंडी सोडवायला पोलीस बळ कमी पडत असल्याचे दिसून येते, त्यामुळे उपलब्ध कर्मचार्यांची दमछाक होत असल्याचेही यावेळी दिसून आले.
चौपदरीकरणाचे काम अर्धवट
मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर यादरम्यान सुरु असलेल्या पहिल्या टप्प्यातील नियोजन शून्य अर्धवट कामामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने प्रत्येक वेळी अशी वाहतूक कोंडी होत असते आणि त्याचा मनस्ताप हा प्रवाशांना वारंवार होत असतो. पहिल्या टप्प्यातील अर्धवट अवस्थेत असलेले आमटेम येथील उड्डाणपूल, नागोठणे येथील हॉटेल कामथ, मिरानगर तसेच हायवे नाका येथील उड्डाणपूल, कोलाड नाका येथील उड्डाणपूल यांसह आवश्यक सेवा रस्ते तयार करण्यात न आल्याने तसेच अनेक ठिकाणी असलेल्या चौपदरीकरणाच्या नियोजन शून्य अर्धवट कामामुळे महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.