ग्रामपंचायतकडून कारवाईची मागणी
। बोर्ली पंचतन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले नदी लगत असलेल्या विहिरींतून बोर्ली पंचतन गावाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, कार्ले पात्रामध्ये अवैधरित्या खोल खड्डे खणून रेजग्याचा उपसा होत असल्यामुळे नदीपात्रातील पाणी गढूळ होण्याबरोबरच नदीपात्रालगत बांधण्यात आलेल्या विहिरींमधील पाण्याची पातळीसुध्दा कमी होत आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.
तालुक्यातील कोर्ले नदीपात्राला लागून असलेल्या बोर्ली पंचतन, दिवेआगर आणि भरडखोल ग्रामपंचायतींनी आपापल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी नदीपात्रालगात विहिरी बांधल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये या विहिरींची पाणी पातळी वाढून गावांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी लघुपाटबंधारे विभागाच्या कार्ले धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येते. परंतु, नदीपात्रामध्ये अवैध रेजग्याचे उत्खनन, विविध व्यावसायिकांद्वारे होणारा पाण्याचा उपसा व गाड्या धुणे याचा एकत्रित परिणाम या तीन गावांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. काही व्यावसायीक स्वतःच्या स्वार्थासाठी अवैध रेजगा व पाण्याचा उपसा करत असल्यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा करणार्या विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होण्याबरोबर पाणी दूषित होत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा गांभीर्याने विचार करुन नदीपात्रात अवैध रेजगा व पाण्याचा उपसा करणार्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन बोर्ली पंचतन ग्रामपंचायतीचे प्रशासक किशोर नागे व ग्रामपंचायत अधिकारी शंकर मयेकर यांनी महसूल प्रशासनाला केले आहे.