टायर फुटल्याने नातेवाईक गंभीर जखमी
। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून रुग्णवाहिका मृतदेह घेऊन जात असताना वारद गावाजवळ आली असता मागचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून चालक अशोक पटेल (26) हे भरत बाबुराव पांचाळ यांचा मृतदेह आणि नातेवाईक यांना घेऊन (वळसंग जिल्हा सोलापुर) येथे जात होते. दरम्यान वारद येथे आले असता रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने रुग्णवाहिका एक्सप्रेसवेवर पलटी झाली. या अपघातात वैजनाथ निवृत्ती पांचाळ (60), रंजना वैजनाथ पांचाळ (50), अंतरा भरत पांचाळ (11) हे तिघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच खालापुर पोलीस, बोरघाट महामार्ग पोलीस, पळस्पे स्टाफ आदी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.